शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
महाराष्ट्रभरात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ८५00 समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत.समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात ग्रामीण भागात सेवा देतात. बाह्यरुग्ण विभाग, दररोज २०हून अधिक ग्रहभेटी तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी त्यांचे औषधी व पाठपुरावा करून आरोग्य पत्रिकेवर नोंद करणे तसेच वेळोवेळी त्यांना रक्त तपासण्या बाबतीत मार्गदर्शन व रेफर करून सेवा देणे ही कामे करतात. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रात योगसत्र वेगवेगळ्या हेल्थ ऍक्टिव्हिटी तसेच निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आहार व जीवनशैलीतील बदल याबद्दल मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या माता, कमी वजनाचे बालक, जुनाट आजार जसे कर्करोग,पॅरालिसिस तसेच वर्षानुवर्षे अंथरुणावर पडून असलेले रुग्ण यांना गृहभेटी देऊन त्यांचा औषध उपचार,आहार,वैयक्तिक स्वच्छता याबद्दल माहिती सांगतात. रुग्णांच्या नातेवाईकांना आजाराबद्दल माहिती व काळजी कशी घ्यावी तसेच मानसिक आधार देतात. समुदाय आरोग्य अधिकारी हे त्या गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचलेले आहेत समुदाय आरोग्य अधिकारी पदावर काम करत असताना त्यांना बऱ्याच अधिकारी,पुढारी,पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक,बचत गट,महिला मंडळ तरुण मंडळ यांच्यासोबत समन्वयाने काम करावे लागते तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रातील इतर कर्मचारी वर्ग आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आशाताई ,प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये वैद्यकीय अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षिका यांच्यासोबत आरोग्य संघाची हेल्थ टीम मेंबर बनवून काम करावे लागते.समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची उपकेंद्रात नेमणूक झाल्यापासून नवजात बालकापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत वाड्यवस्त्यावर , खेड्यापाड्यात तसेच दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचलेली आहे .
आज प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीकडे समुदाय आरोग्य अधिकारी यांचा संपर्क क्रमांक आहे. प्रत्येक इमर्जन्सी आणीबाणीच्या काळात पहिला कॉल समुदाय आरोग्य अधिकारी यांना जातो आणि इमर्जन्सी बद्दल माहिती दिली जाते.१०८ॲम्बुलन्सला कॉल करून ॲम्बुलन्स मध्ये बसून तो हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्याचा पाठपुरावा समुदाय आरोग्य अधिकारी करतात.आरोग्याबद्दलच्या नवीन योजनांची माहिती,आरोग्य विमा योजना,जन आरोग्य योजना आणि वेळोवेळी शासकीय योजनांमध्ये झालेले बदल व लागणारी कागदपत्राची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी यांना विचारली जाते व गावातील प्रत्येक व्यक्तींचे आरोग्याबद्दलच्या शंकानिरसन व मार्गदर्शन समुदाय आरोग्य अधिकारी करतात.
आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात काम करत असताना समुदाय आरोग्य अधिकारी यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो पण सगळ्या त्या अडचणीवर मात करून ते आपली आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असतात आरोग्याच्या सेवेच्या या इतिहासात आतापर्यंत असा कुठलाच अधिकारी कर्मचारी नाही ज्यांनी गावातील प्रत्येक घरात,वाडी वस्त्या,डोंगरदरी,उसाच्या फडात जाऊन प्रत्येक लाभार्थांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविलेली आहे फक्त समुदाय आरोग्य अधिकारी एकमेव आहे ज्यांनी हे आरोग्य रक्षण आरोग्यवर्धन आणि आरोग्य प्रतिबंधन ही उपचार सेवा घरोघरी पोहोचलेली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी उच्चशिक्षित असून आपल्या पदाचा व शिक्षणाचा कुठलाही गर्व अभिमान न बाळगता गोरगरीब जनतेला रात्रंदिवस अविरत सेवा देत आहेत.प्रामाणिकपणे सेवा देऊन त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही खंत आहे. अतिशय तटपुंजा पगारात त्यांना आपला परिवार चालवावा लागतो. समुदाय आरोग्य अधिकारी पद हे निव्वळ कंत्राटी असल्यामुळे त्यांच्या बदल्या होत नाहीत,मुलाच्या शिक्षणासाठी हक्काचं घर बनवण्यासाठी कुठलीच शासकीय बँक त्यांना कर्ज देण्यासाठी तयार नसते जे काम करतात त्यांना त्यांच्या हक्क मिळालाच पाहिजे समुदाय आरोग्य अधिकारी यांना समान काम समान वेतन देऊन त्यांचे समायोजन करून घेणे ही काळाची गरज आहे.जर शासनाने असे केले तर समुदाय आरोग्य अधिकारी अत्यंत दर्जेदार सेवा देण्यास तत्पर राहतील.
अर्चना एकनाथ आघाव समुदाय आरोग्य अधिकारी पुणे जिल्हा.