शिरूर नगरपरिषद व्यस्त आणि नागरिक त्रस्त.
शुभम वाकचौरे
: शिरुर नगर परिषद हद्दीतील वाडा कॉलनी येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, शिरूर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हे खड्डे करून ठेवलेले असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अपघातांची मालिका सुरू असून, नुकत्याच घडलेल्या दोन गंभीर घटनांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. एका महिलेचा दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाला. सुदैवाने त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. संबंधित घटनेनंतर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आणि स्वच्छता विभाग प्रमुख आदित्य बनकर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरीत दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही.आज पुन्हा एक गंभीर अपघात घडला,या दुर्घटनेत साई तुषार काहाने वय ६ वर्षे या लहान मुलाला ८ टाके पडले आहेत. अशा घटनांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील अनेक भागांत नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच, प्रशासनाकडून कोणत्याही समस्येवर परिणामकारक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या वेळोवेळी कळविण्यात आल्या आहेत. अनेकदा तक्रारींसाठी अधिकाऱ्यांना तक्रारी ग्रुपमध्ये सामील होण्याची विनंती करण्यात आली आहे; मात्र त्या विनंतींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांना देखील या संदर्भात गुरुवारी वैयक्तिक संदेशाद्वारे तक्रार नोंदविण्यात आली होती. परंतु, परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यात फारसा रस नसल्याचे स्पष्ट होते.शिरुर नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.