शुभम वाकचौरे
जांबूत: ( ता: शिरूर) जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने जांबूत ग्रामस्थांकडून गाव बंद रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन तहसिल कार्यालय शिरूर, शिरूर पोलीस स्टेशन ,वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर येथे लेखी निवेदन देण्यात आले.मौजे जांबूत तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे सोमवार दिनांक २६/०८/२४ रोजी श्रीमती मुक्ताबाई भाऊ खाडे वय (६०) यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही पाच व्यक्तींना ठार केलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे. वनविभाग व इतर शासकीय विभाग गंभीरतापूर्वक दखल घेत नसल्यामुळे जांबूत ग्रामस्थ मंगळवार दिनांक २७/०८/२४ रोजी दुपारी १ पासून गाव बंद आंदोलन करून जांबूत एसटी स्टँड च्या मुख्य चौकात रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जांबूत परिसरात बिबटयांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जांबूत मध्ये बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले हे सतत वाढत आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव पशू व प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहे. तसेच त्याचे दर्शन दिवसाही होऊ लागले आहे, यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे असल्याने जांबूत ग्रामस्थांकडून गाव बंद रस्ता रोको आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिबट्याला भक्ष भेटले नाहीतर मनुष्यावर हल्ला करायलाही तो मागेपुढे पाहत नाही. लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मेंढपाळ, शेतकरी,लहान मुले महिलांमध्ये कमालीची असुरक्षितेची भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे.

यावेळी माजी पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश मेहत्रे ,अव्वल कारकून अनिल पाटील ,पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, ऍड सागर जोरी, ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे, युवराज पळसकर, माऊली जगताप,विकास कवडे,रवी म्हस्के , विकास डफळ, सचिन म्हस्के आदी उपस्थित होते.